Getting your Trinity Audio player ready...
|
MEDIA CONTROL ONLINE
विधानपरिषद निवडणुकीची मतदान प्रक्रिया संपल्यानंतर आता भाजप आणि महाविकास आघाडीतील पक्षांनी आपापल्या उमेदवारांना दिलेल्या मतांच्या कोट्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपने आपल्या पहिल्या चार उमेदवारांसाठीच प्रत्येकी ३० मतांचा कोटा वापरला आहे. त्यामुळे भाजपचा १२० मतांचा कोटा इथेच संपणार आहे. पाचव्या जागेवरील प्रसाद लाड यांना निवडून आणण्यासाठी भाजपला १३४ आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीच्या आधारे मतमोजणी झाल्यास पहिल्या फेरीतील उमेदवारांची अतिरिक्त मते ही प्रसाद लाड यांना ट्रान्सफर होतील. भाजपच्या चारही उमेदवारांसाठी ३० चा कोटा देण्यात आला होता. उमेदवार जिंकण्यासाठी २६ मतांचा कोटा आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराची अतिरिक्त चार मते अशी एकूण १६ मते प्रसाद लाड यांना दुसऱ्या फेरीत मिळतील. पहिल्या चार उमेदवारांसाठी १२० चा कोटा वापरला जाऊन तीन मतं शिल्लक राहतील. त्यानंतर दुसऱ्या फेरीत या चार उमेदवारांची प्रत्येकी चार अतिरिक्त अशी १६ मतेही लाड यांना मिळतील. त्यामुळे १६+३ अशी १९ मते प्रसाद लाड यांच्यासाठी उपलब्ध होतील. त्यामुळे २६ मतांच्या कोट्यानुसार प्रसाद लाड यांना आणखी ७ मते गरजेची आहेत. त्यामुळे या मतांची जमवाजमव करण्यात भाजप यशस्वी ठरणार का, यावर या निवडणुकीचा निकाल अवबंलून आहे.
तर दुसरीकडे शिवसेनेने सचिन अहिर आणि आमशा पाडवी या दोन उमेदवारांना प्रत्येकी ३२ मतं दिली आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या भाई जगताप यांच्यासाठी दुसऱ्या फेरीची मतमोजणी झाल्यास शिवसेनेची अतिरिक्त १२ मतं ही भाई जगताप यांना मिळतील. काँग्रेसने आपल्या पहिल्या उमेदवाराला म्हणजे चंद्रकांत हंडोरे यांना २९ मतं दिल्याची माहिती आहे. त्यामुळे काँग्रेसकडे अतिरिक्त १५ मते आहेत. यामध्ये शिवसेनेची १२ आणि काँग्रेसची १५ अशा एकूण २७ मतांचा कोटा मिळवून भाई जगताप विजयी ठरू शकतात. मात्र, त्यासाठी शिवसेनेच्या आमदारांनी तिसऱ्या पसंतीची मते कोणाला दिली आहेत, यावर बरीच समीकरणे अवलंबून आहेत.