Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर प्रतिनिधी सुलोचना नार्वेकर : आज सोमवार २७ जुलै रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस. आजच भारतीय जनता पक्षाने कार्यकारिणी बैठक बोलावली होती.
या बैठकीतील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण मी दूरचित्रवाणीवर लाईव्ह ऐकले. संपूर्ण राज्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करीत असताना, भारतीय जनता पार्टी मात्र त्यांना अपशकुन करीत आहे. त्यांच्या कामाचे कौतुक राहूद्या; किमान अपशकून तरी करू नका, असा घणाघात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे.
श्री मुश्रीफ म्हणाले, श्री.ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर लगेच जगातील २१० हून अधिक राष्ट्रांसह भारतातही कोरोना महामारीचा संसर्ग सुरू झाला . अशा परिस्थितीत प्रशासनाचा कोणताही अनुभव पाठीशी नसताना, एवढ्या कमी वेळेत कोरोनासारख्या या जागतिक महामारीवर विजय दृष्टिक्षेपात आणला असताना खरंतर आजच्या वाढदिनी मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्या संयमी व सुसंस्कृत आणि प्रांजळ स्वभावाचं कौतुक व्हायला हवं होतं.
परंतु; ते राहिल बाजूलाच. त्यांच्यावर तोंडसुख घेऊन त्यांना अपशकुन घडवण्यासाठी भारतीय जनता पक्षाने ही कार्यकारिणीची बैठक बोलावली. त्यांच्या या घाणेरड्या प्रयत्नाबद्दल आम्ही निषेधच व्यक्त करीत आहोत.
या बैठकीत भाजपने अनेक विषय मांडलेले आहेत. त्यांची परवा झालेली मुलाखत, महाबीज बियाणे, युरिया, दूध इत्यादी बाबत श्री फडणवीस यांनी मत व्यक्त केलेली आहेत.
परंतु; ते सोयीस्कररीत्या हे विसरले आहेत की पृथ्वी अवतरल्यापासून पहिल्यांदाच इतके महाभयानक कोरोना महामारीचे संकट उद्भवले आहे. त्यामुळे सगळेच कारखाने गेली चार-पाच महिने बंद आहेत. त्यामुळे आमच्या सरकारच्या गेल्या पाच वर्षातील काळात असं काही नव्हतं, अशी हास्यास्पद विधाने तरी करू नका.
किमान एवढा तरी शहाणपणा शिल्लक ठेवा!
श्री मुश्रीफ म्हणाले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तर सातत्याने म्हणतात, महाराष्ट्रातील सरकार आम्ही पडणार नाही. महाविकास आघाडीतील पक्षांच्या अंतर्गत विरोधामुळे सरकार पडेल, असाही दावा करतात.
तर मग श्री फडणवीसांना माझा सल्ला आहे, की शांत राहून आमच्यातील अंतर्गत विरोधामुळे सरकार पडायची तर वाट बघा. किमान एवढा तरी शहाणपणा शिल्लक ठेवा की!