Getting your Trinity Audio player ready...
|
विशेष प्रतिनिधी : अतुल पाटील
कोल्हापूर जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. अनेक नद्या नाले ओहर फ्लो झाले आहेत. त्यात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे करवीर पूर्वभागातील उजळाईवाडी, उंचगाव, गडमुडशिंगी , नेर्ली, तामगाव ,गोकुळ शिरगाव, कणेरी या गावातील
शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस पिक धोक्यात आले आहे.
पाऊस व सोसाट्याच्या वाऱ्यामुळे उभा ऊस जमीनदोस्त झाला आहे.आडवा तिडवा ऊस पडल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागणार आहे.
आधीच कोरोना मुळे शेतकरी
अडचणीत सापडला आहे. त्यात शेतकऱ्यांना अतिवृष्टीच्या पावसामुळे नव्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ऊस पीक जमीन दोस्त झाल्यामुळे ऊस कुजणे, जमिनीवरील उसाला उंदीर व इतर किटक व प्राण्यांकडून कुरतडण्याचे प्रकार घडणार आहेत. जमिनीवरील ऊसाला फुटवे फुटून साखर उतारा कमी होण्याचे प्रमाण वाढणार आहे.
यासह अनेक कारणामुळे उसाचे उत्पादन प्रचंड घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.
करवीर पूर्व भागातील शेतकऱ्यांना शेतीवरचं उदरनिर्वाह करावा लागतो. पावसामुळे ऊस शेती बरोबर भाजीपाला, भात, भुईमूग ,सोयाबीन या पिकांचेही प्रचंड नुकसान झाले आहे.