Getting your Trinity Audio player ready...
|
कोल्हापूर दिनेश चोरगे : गेल्या मार्चपासून सहा महिने कोरोना महामारीमुळे कोल्हापुरातील जनतेला वेठीस धरले जात आहे. सुरुवातीच्या काळात केंद्र सरकारच्या अविचारी निर्णयामुळे महाराष्ट्रातील जनता जीव मुठीत घेऊन कसेबसे जगत आहे. असे शेतकरी कामगार पक्षाचे शहर चिटणीस बाबुराव कदम यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे.
पूर्वीच्या लॉक डाऊनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. उलट या लॉकडाऊनमुळे जनतेची गैरसोय झाली आहे. गेल्या काही दिवसात लॉकडाऊन सूट दिल्यामुळे काही उद्योग व्यवसाय सुरू झाले असले तरी यामधून लोकांची विस्कटलेली आर्थिक घडी व्यवस्थितपणे सावरलेली नाही.
छोटे कामगार, व्यवसाईक, रिक्षावाले व रोजंदारीवरील कामगार यांचे रोजचे जीणे अवघड झाले आहे. सध्या फक्त दवाखाने व मेडिकल यांचीच चलती चालू आहे, अशा परिस्थितीत को.म.न.पा ने दि. ११ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर पर्यंत जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे.
कोरोना परिस्थितीत महापालिकेने आरोग्य विषयक गोष्टींची पूर्तता करावी व केलेल्या कामाची योग्य प्रकारे दखल घ्यावी. जनता कर्फ्यू सारखे निर्णय घेऊन जनतेस वेठीस धरू नये, या जनता कर्फ्यूला शेतकरी कामगार पक्षाचा तीव्र विरोध आहे, असेही शेतकरी कामगार पक्षाचे शहर चिटणीस बाबुराव कदम पत्रकाद्वारे म्हणाले.