Getting your Trinity Audio player ready...
|
विशेष प्रतिनिधी : रोहित वज्रमट्टी
कोल्हापूर : कोल्हापूर शहर हवा प्रदूषणमुक्त करण्यासाठी नागरिकांनी राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमात सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन महापौर सौ. निलोफर आजरेकर यांनी केले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त कोल्हापूर महानगरपालिकेच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमाचा शुभारंभ महापौर निलोफर आजरेकर आणि आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते गांधी मैदान येथे करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
कोल्हापूर शहरातील हवेची गुणवत्ता स्वास्थ्यपूर्ण रहावी, यासाठी सर्वांनी सातत्यपूर्ण प्रयत्न करावेत, असे आवाहन करुन महापौर निलोफर आजरेकर म्हणाल्या की, राष्ट्रीय शुध्द हवा कार्यक्रम महापालिका क्षेत्रात अधिक नियोजनबध्द राबविण्यासाठी प्रशासन दक्ष राहील, शुध्द हवा कार्यक्रमांर्तगत सफाई आणि स्वच्छतेवर अधिक भर दिला जाईल. जल ,जमीन, हवा वनस्पती ही नैसर्गिक संसाधने असून त्यांचा दर्जा व गुणवत्ता खालावणार नाही ,प्रदूषण होणार नाही याची दक्षता सर्वानी घ्यावी.
यावेळी आयुक्त डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी म्हणाले की, कोल्हापूर शहर हवा प्रदूषण मुक्त होण्यासाठी महापालिका प्रशासनामार्फत करावयाच्या उपाययोजनांचा कृतीआराखडा तयार करुन त्यांची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल, उघड्यावर पालापाचोळा जाळणे, वाहनांचा अतिवापर न करणे इत्यादी बाबींचे महत्त्व त्यांनी यावेळी सांगितले. शुध्द हवा कार्यक्रमात अधिकाधिक लोकसहभाग वाढविण्यावर भर दिला जाईल.
महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांबरोबरच शहरातील तरुण मंडळे, महिला मंडळे, स्वंयसेवी संस्थांनी सहभागघ्यावा,असे आवाहनही आयुक्त डॉ.कलशेट्टी यांनी केले.
प्रारंभी पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्राबंरे यांनी स्वागत करुन या कार्यक्रमाची रुपरेषा सांगितली.
यावेळी उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समिती सभापती सचिन पाटील, नगरसेवक अशोक जाधव, आरोग्य अधिकारी डॉ. अशोक पोळ, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, उपशहर अभियंता एन.एस. पाटील, कॉ. चंद्रकांत यादव, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्राबंरे, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार यांच्यासह अन्य सन्माननीय पदाधिकारी, नगरसेवक तसेच अधिकारी उपस्थित होते.